एकांत आणि एकटेपणा 

मराठी माणसाच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ‘ गीतरामायण !! ग. दि. मां नी पहिले काव्य लिहिले , बाबूजींनी सुरेख चाल लावली आणि आकाशवाणी मध्ये  गेले तेव्हा लक्षात आले की गीत लिहिलेला कागदच हरवलाय . मग आकाशवाणीचे सीताकांत लाड यांनी ग दि मा ना एका खोलीत बंद केले . त्या दहा मिनिटाच्या  ‘एकांतात ‘ त्यांना सुचलेले अजरामर गीत म्हणजे  ‘स्वये श्री राम प्रभू  ऐकती ‘ . म्हणजे एकांतात शांत चित्ताने पूर्ण लक्ष केंद्रित केल्यावर मिळणारा  हा मधुर परिपाक !

एकांत हा सामान्यतः सृजनशील असतो . ती शरीराची नाही तर मनाची अवस्था आहे . सर्वत्र एक जीवन व्यापून टाकणारा गोंगाट आहे , आयुष्याचा अटळ ताण आहे , अनेक विषयांची डोक्यात सरमिसळ आहे , नेमका मार्ग शोधायचाय किंवा स्वतःला काय हवंय ह्याची  प्रामाणिकपणे मीमांसा करायचीय तर काही काळ ह्या गोंगाटा पासून दूर एकांतात जावे . अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळतील.  याचे कारण , प्रश्न जर आपल्या मनाची असतील तर उत्तरही आपलेच मन देऊ शकते , जे एक शाश्वत समाधान घेऊन येते .

अमेरिकेतील प्रसिद्ध  अब्जोपती    खनिजतेल व्यावसायिक पॉल गेट्टी हे रोज त्यांच्या अभ्यासिकेत शांतपणे एक तास घालवत . तिथे त्यांना व्यवसाया संबंधी नवीन कल्पना सुचत , आणि प्रत्येक वेळी ते यशस्वी होत.    एनिली रुफस यांचे प्रसिद्ध पुस्तक ‘ द पार्टी ऑफ वन ‘ हे एकांत , त्याचे फायदे , गरज आणि तो मिळवण्याचे मार्ग ह्यावर प्रकाश टाकते . त्यांच्या मते आपल्याला इतरांमध्ये जास्त न मिसळावे  वाटणे ह्यात गैर काहीच नाही . ती आपली मानसिक गरज आहे . त्यामुळे ज्या व्यक्तीस एकांतात राहणे आवडते त्यांनी अपराधी वाटून घेण्याची गरज नाही.     अल्बर्ट आइन्स्टाइन यांना एकांतात राहूनच आपल्या वैज्ञानिक शोधातील सिद्धांत आणि मार्ग सापडत . थॉमस अल्वा एडिसन यांच्या एकाग्र एकटेपणाचे तर मजेशीर किस्से आहेत .

जगप्रसिद्ध चित्रकार के .  के .मूस  हा नवी कलाकृती  करण्यापूर्वी एकांतात जाऊन चिंतन करत असे . त्यानंतर त्यांच्या कुंचल्याने इतिहास घडवला . पाब्लो पिकासो ने म्हटले होते की ,  ” कुठल्याही महान कार्याचे बीज हे एकांतात पेरले गेले आहे . “आतली ऊर्जा सकारात्मक पद्धतीने बाहेर काढून नवा आनंद शोधायला थोडा एकांत हवाच. साधना , तपश्चर्या करण्यासाठी  ऋषि मुनी , साधू संत  हे दूर , रम्य ठिकाणी एकांत वासात जात . त्यानंतरच त्यांच्याकडून  साऱ्या जगाला नवीन तत्वज्ञान किंवा दृष्टी  प्रदान  होत असे  . एक ग्रीक सांता ला कुणी विचारले होते की सगळ्यात कठीण गोष्ट कोणती आहे ? …त्यांनी उत्तर दिले होते  ” आत्मशोध ”

सर्वसामान्यांच्या आयुष्यात अनेक नाती , समाज बंधने असतांना जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन हा एकांतातूनच मिळतो . आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडतो . एखाद्या आवडत्या पुस्तकावर  इतरांशी चर्चा होऊ शकते , पण चिंतन , मनं आणि अनुभूती ही एकांतातच होऊ शकते .

असे म्हणतात की आपल्या हरवलेल्या भावना  , इच्छा आणि विचार आपण शांततेत हरवलो की सापडतात . त्यामुळे कितीतरी स्त्रियांना मुले मोठे होई पर्यंत ,आणि घरातील इतर जबाबदाऱ्या पार पाडेपर्यंत आपल्यातील सुप्त गुणांचा शोधच लागत नाही . उत्तर आयुष्यातील काही निवांत क्षणात त्यांना आतून उर्मी येते आणि मग त्यांच्या साठी एक नवे दालनच उघडते . त्यात चित्रकारीता , गायन , लेखन , संगीत , नृत्य,  असे अनेक छंद जोपासण्याची अनिवार इच्छा जागी होते . त्यापूर्वी निवांत स्वतःशी संवाद करायला वेळच मिळालेला नसतो .

मॅरेथॉन , ट्रायथलोन सारखे खेळ ही निवांत शरीराची आणि मनाची मशागत करण्यासाठी शेधून काढले असणार.   भर गर्दीत राहूनही मनाला पुर्णपणे त्यापासून तोडणे ही मनाची  एकांत अवस्थाच आहे.  एकांत ही हवी हवीशी भावना आहे , एक मौन साधना आहे , जी आपण आनंदाने जाणीवपूर्वक निवडलेली असते . एकटेपणा मात्र परिस्थिती ने किंवा इतरांनी आपल्यावर लादलेला असतो . गरजेच्या वेळी आपल्या माणसाने साथ सोडली की एकटेपणाची जाणीव होऊ लागते .

चीन मध्ये एक काळ असा आला की करिअर च्या नादात मुली अविवाहित रहाण्याचे प्रमाण वाढले. ह्यातून एकटेपणा निर्माण झाला . ह्या परिस्थिती तुन बाहेर पडण्यासाठी सरकारनेच तरुण अविवाहित मुलींना “‘ डेटिंग लिव्ह “” देण्याचा प्रस्ताव मांडला .

तसं बघितलं तर एकांत आणि एकटेपणा ह्या दोन्ही अवस्था भौतिक दृष्ट्या सारख्याच.  फरक पडतो तो फक्त मानसिकतेचा ….स्वतःला स्वतःशी जोडण्याचा. काही जण गर्दीत एकांत अनुभवू शकतात तर काहींना एकांतातही शांत लाभत नाही. एकटं असणं वेगळं , आणि एकटं वाटणं वेगळं. एकांत मागून घ्यावा वाटतो तर एकटेपणा कधीच वाट्याला येऊ नये असा …..

जन्मतः मनुष्य प्राणी एकांत प्रिय नाहीच . म्हणून लहान बालकांना सतत कुणाचीतरी सोबत लागते . अन्यथा निसर्गानेच त्यांना जन्मानंतर लगेच स्वावलंबी केले असते.   एखादी व्यक्ती एकांत प्रिय आहे म्हटल्यानंतर तिच्या बद्दल अनेक तर्क वितरक लावल्या जातात . कारण अल्पशा काळाच्या एकांता कडे आपण एक सहज प्रवृत्ती म्हणून बघतो . पण नेहमीच एखाद्याला एकटं रहायला आवडतं म्हटलं की त्याच्या मागच्या कारणांचा शोध सुरू होतो . त्यामागील कारणं सर्वसाधारणपणे अशी असू शकतात …

नात्यांमधील दुरावा ,

कुणाच्या अतिशय जिवलगा व्हा मृत्यू ,

जाणीवपूर्वक हेकेखोर पणे एकटेपण ,

मानसिक आजार , समाजाने वाळीत टाकणे ,

बेकारी ,अथवा संसर्गजन्य आजार ……म्हणजे त्याला नकारात्मक किनार असलीच पाहीजे ,अथवा का कुणी एकटेपण पसंद करेल ? ही आपली मानसिकता . मग त्या व्यक्तीला  “ह्यातून”” बाहेर काढण्याचे उपाय शोधले जातात . अशा एकतटेपणाचा स्वीकार इतरांकडून सहजपणे होत नाही .

इंग्लंड मधील एक सर्व्हे मध्ये खूप धक्कादायक सत्य समोर असले आहे. तिथे जवळपास 90 लाख लोकं हे एकटेपणाने ग्रासलेले आहेत . ह्यात ज्येष्ठ नागरिक फार मोठया संख्येने आहेत . यातील 17 टक्के ज्येष्ठ नागरिक आपल्या कुटुंबाशी आठवड्यातून एकदा तर 11 टक्के हे महिन्यातून एकदा भेटू , बोलू शकतात . बदललेली जीवन शैली , आत्मकेंद्रित विचार , करिअरची चिंता आणि जीवघेणी स्पर्धा ह्याला कारणीभूत आहे . ज्येष्ठ नागरिकांना जगभर भेडसावणारा प्रश्न हा एकटेपणा आहे . आपल्याकडे देखील बऱ्याच प्रमाणात , विशेषतः शहरात हे चित्र बघायला मिळते . तरुण मुले , नातवंड परदेशात आणि फक्त वृद्ध आई वडील इथे एकटे भारतात असणे आपल्याचवती भवती दिसते . अशा वेळेला नात्याची जबाबदारी  आणि  खोली दोन्ही वर प्रश्नचिन्ह लागते .

अनेक प्रसिद्ध  व्यक्ती , विशेषतः सिने कलाकार खूप वर्ष प्रसिद्धीच्या झोतात असतात . पण करिअरच्या शेवटच्या टप्प्यात फार फार एकाकी पडतात . एकटेपणा त्यांना पोखरत असतो . ‘ ट्रजेडी क्वीन ‘ म्हणवल्या जाणारी अभिनेत्री मीनाकुमारी आयुष्याच्या शेवटाला एकटी पडली होती , व्यसनाच्या आहारी गेलेली .  असे एक नाही , अनेक उदाहरणे देता येतील . आधी सतत एक वलय घेऊन वावरलेल्या ह्या ‘ स्टार्स ‘ ना असा एकटेपणा एक भयाण शेवटाकडे नेतो .

नात्यांचेच बोलायचे तर पतीपत्नीचे नाते खरे तर आयुष्यभराचे . पण त्यात कायम फक्त आणि फक्त एकाची मर्जी , अथवा निर्णय आणि निवड स्वातंत्र्य एकालाच जर असेल तर दुसरी व्यक्ती फार एकाकी पडते . अशा नात्यातील गोडवा संपून उरतो तो फक्त कोरडा उपचार ! नात्यात ती व्यक्ती असते , पण तिचे अस्तित्व जाणवतच नाही . तिला समजून घेणारे कुणी नसेल तर तो एकटेपणा प्रचंड नैराश्य निर्माण करतो , आरोग्यावर दूरगामी परिणाम करतो . दोन व्यक्ती फक्त एकत्र रहाण्याने एकटेपणा संपत नाही . त्यांच्या मनाच्या तारा जुळाव्या लागतात . नाहीतर आळूच्या पानावरच्या थेंबासारखे होईल नाते . सोबत असूनही वेगळे .

काही कार्यक्रमा निमीत्त जर नातेवाईक एकत्र जमले तर काही मिनिटांच्या ख्याल खुशाली नंतर  चित्र वेगळेच दिसते . प्रत्येक जण हातात मोबाईल घेऊन आपापल्या जगात प्रवेश करतात . सगळ्यात असून एकटे. आप्तांशी पाच दहा मिनिटे बोलणे कंटाळवाणे वाटते , पण अनोळखी लोकांशी फेसबुकवर तासंतास गप्पा !

एकटेपणात काही अपवाद सोडता निराशा, मरगळ , एक प्रकारची नकारात्मकता आहे . एकटेपणा मुळे मानसिक आजार बळाऊन व्यक्ती वाईट सवयीच्या आहारी जाऊ शकते . विनाकारण चिडचिड होते . मनुष्य सत्वहीन  होऊ लागतो.  वयानुरूप शिथिलीकरण येतेच , पण एकाकीपणाने ती प्रक्रिया आणखीन वेगात होते. हृदयावर वाईट परिणाम होतो . मानसिक संतुलन बिघडू शकते. म्हणूनच गुन्हेगाराला एकटेपणाची शिक्षा दिली जात असणार  . इथे मिळणारा वेळ हा एकांत होऊ शकत नाही , कारण तो दीर्घ  कालावधी करता थोपलेला असतो . बाकी जगाशी नाळ तोडून भयाण पोकळी निर्माण करणारा , शिक्षा म्हणून मिळालेला जीवघेणा एकटेपणा !!!

एकटेपणा मुळे  होणारा परिणाम हा स्थळ ,काळ आणि वृत्ती ह्यावर अवलंबून आहे.  एकटेपणाची शिक्षा असतांनाही  मानसिक संतुलन अबाधित ठेऊन त्यातून आपल्यातील उत्तम सृजन बाहेर काढण्याचे कसब स्वातंत्र्यवीर सावरकर , लोकमान्य टिळक आणि पंडित नेहरू यांना साधले . टिळकांचे गीता रहस्य , सावरकरांचा हिंदुत्ववाद  , महाकाव्य , आणि नेहेरूनचे  ‘ डीसकव्हरी ऑफ इंडिया “यासारख्या अत्यंत उच्च दर्जाच्या साहित्य कृतींची निर्मिती तुरुंवासात झाली . इथे मात्र  त्यांनी एकाकी  पणावर आपल्या सामर्थ्याने मात केली . ही मंडळी सर्वार्थाने असामान्य होती.

सामान्य माणसाला मात्र  एकटेपणाची भीती वाटते . मुले मोठी झाली , घराबाहेर पडली की आपण एकटे पडू ही भीती पालकांना असतेच . एकटेपणा माणसाला कमकुवत बनवतो . एकांत माणसाला भविष्याची नवे स्वप्न दाखवतो आणि एकटे पणा माणसाला भूतकाळात नेऊन अनेक जखमांना विनाकारण कुरवाळायची अनावश्यक संधी देतो .

त्यामुळे माणूस आज हातात असलेल्या सुखाची कास न धरता निसटून गेलेल्या चुकार क्षणांच्या मागे उरस्फोड करतो . कित्येकदा यशाचे परमोच्च शिखर गाठल्यावर तिथे तो एकटाच असतो  . त्याच्या यशाच्या धुंदीत तो एकटाच पुढे गेलेला आणि बाकी जिवलग खूप खाली सुटून गेलेले असतात . अशा स्थितीत अनेक ठिकाणी तीव्र नैराश्याने एकटेपणाचा शेवट मृत्यूत झालेला दिसतो .

असे असूनही बऱ्याच प्रमाणात तरुण मुले , मुली अविवाहित राहून आपले  ‘स्टेटस ‘  ‘ सिंगल ‘ ठेवणे पसंद करतात . नुसते दाखवण्यासाठी नाही तर खरेच अविवाहित राहून . का त्यांना हा एकटेपणा हवा आहे ह्याचा अभ्यास केल्यास अशी कारणे सापडतात .

* अविवाहित माणसाला भरपूर एकांत मिळतो . स्वतःला हवे तसे घडवता येते .

* कुठलीही सांसारिक जबाबदारी अंगावर येत नाही .

* आपल्या मताप्रमाणे आयुष्य घालवता येते .

* कुणीही पाळत ठेवत नाही . टोकत नाही .

* कुणालाही उत्तर द्यावे लागत नाही . असे असले तरी आशा एकटे

* आपल्या निर्णयाचे परिणाम आपणच भोगणार , तसेच इतरांच्या चुकीच्या निर्णयाचा त्रास आपल्याला होत नाही .

रहाणाऱ्या तरुणांना काही प्रश्न भेडसावत असतात . जसे …

* ह्या व्यक्ती समाजात सहज मिसळू शकत नाहीत .

* हे लोक टीका सहन करू शकत नाहीत

* यांना क्वचितच मित्र असतात .

* यांना फारसे कुणी पसंद करत नाही .

बर्कले ने मांडलेला एक तात्विक विचार सर्व तत्ववेत्यांमध्ये  चर्चेचा विषय झाला होता .  जंगलात उन्मळून पडलेला वृक्ष ( ट्री फॉलन इन फॉरेस्ट )हा तो विषय आहे . वृक्ष उन्मळून पडतांना तो एकाकी असेल , जर तिथे कुणीच नसेल , कुठलाही प्राणी देखील नसेल तर तो आवाज करतो का ? असा त्याचा तात्विक प्रश्न !! कारण आवाज हा शेवटी हवेतील एक कंपन आहे फ़क्त !!

कानाच्या रचनेमुळे त्याचे आवाजात म्हणजे ध्वनित रूपांतर होते . तसा ऐकणारा कानच नसेल तर ध्वनी ही नसणार ना !!

हेच तत्व आता इतर अनेक एकांड्या गोष्टींना लावल्यास एक नवा दृष्टिकोन आपल्यास मिळतो . एकट्या दुर्लक्षित पडलेल्या हीऱ्याची किंमत शून्य !!

बहिणाबाईंची प्रतिभा तशीच विरून गेली असती जर त्यांच्या चिरंजीवांच्या मार्फत ते आपणापर्यंत पिहोचले नसते . म्हणजे

“” एकाकी  दुर्लक्षित “”    असणे हा प्रतिभेला मिळालेला शापच !! असे तर कित्येक एकाकी  तीव्र बुद्धिमान मेंदू दुर्लक्षित राहिले असतील ह्या विचारानेच अस्वस्थ व्हायला होते .

सामान्य माणसाच्या आयुष्यात भावना आणि मेंदू यांच्यात द्वंव होऊन मेंदूचे ऐकल्यास माणसं एकटे पडू शकतात , आणि भावनेवर घेतलेले निर्णय गंतव्यापर्यंत नेतीलच याची शाश्वती नसते , अशी काहीशी गंमत आहे .  वैचारिक मतभेदातुन एखाद्याला एकटे पाडल्यास त्याची वेड्यासारखी अवस्था होते . असा एकटेपणा माणसाला पोखरून टाकतो.  निसर्गतः मनुष्यप्राणी कळपात राहणारा आहे. आपले विचार , सुख दुःख वाटून घेऊन सहवासाची ओढ घेऊन तो जगतो. ह्या गोतावळ्यात चिंतना पुरता एकांत तो शोधतो . ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महान वैज्ञानिक आर्किमिडीज. त्याला जेव्हा उत्पलाविता चा सिद्धांत सापडला तेव्हा तो  ” युरेका , युरेका !! ” असे ओरडत मनुष्य वस्ती कडे धावला. ह्यासाठी नाही की त्याने शेवटी तो शोध लावला , पण ह्यासाठी की हे त्याला बाकी सगळयाना सांगायचे होते . तो आनंद वाटायचा होता .

सर्वांनाच कधी न कधी एकटेपणा जाणवत असतो . अनेक मित्रांच्या घोळक्यात जर खरे जिव्हाळ्याचे मित्र नसतील तर गर्दीतही एकटेपणाची भावना येते .  असंख्य प्रसार माध्यमं आहेत ,  ‘सोशल मीडिया ‘  मार्फत माणसाला जगाशी जोडणारी . त्यातून असंख्य ‘ वर्चुअल फ्रेंड्स ‘ जोडल्या जातात. असले आभासी मैत्रीचे जग तर अजूनच घातक . दिवसभरात असंख्य मेल्स आणि मेसेजेस पाठवून केलेली आभासी मैत्री ही चणे फुटण्यासारखी आहे . प्रत्यक्ष आप्त मित्रांचा सहवास आणि हितगुज हे  मात्र मनसोक्त जेवणासारखे आहे . तुडुंब समाधान देणारे . जीवघेण्या स्पर्धेत टिकतांना मायेने पाठीवर हात फिरवणारे स्वीय हवेत आणि मन मोकळं उधळून जगायला चार मित्र ही हवेत . मग कशाला जाणवतो एकटेपणा ? मग कदाचित थोडासा एकांत मिळवून ह्याच नात्याची वीण आणखी घट्ट कधी करता येईल ह्यावर चिंतन करावे वाटेल . ही नात्याची वीण पूर्वीच्या काळी फारच घट्ट होती . सणावाराला , किंवा कार्यप्रसंगी  भरपूर नातेवाईक जमत . एरवीही घराचे गोकुळच असे. घरची लक्ष्मी सदैव प्रसन्न . एकटेपणाचा लवलेशही नसे . आपलेपणा , आपुलकी , जिव्हाळा यांनी माणूस माणसाशी जोडलेला असे . …आता सारखा डिजिटल माध्यमांनी नाही !!

ह्या   डिजिटल माध्यमांनी तर आपल्यावर अशी काही मोहिनी घातलीये की रोज उठताक्षणी हातात ब्रश घेण्यापूर्वी मोबाईलच येतो . इतरांच्या आयुष्यात काय काय गंमत चाललीये , मी इथे बसून ह्यातील काय काय गमावतोय ह्या निरर्थक भीतीला मानस शास्त्रीय संज्ञेत  ‘ फोमो ‘  , ( फिअर ऑफ मिसिंग आऊट ) असे  म्हणतात. ह्या फोमो मुळे आपली सारासार विचार करण्याची कुवत गहाण  पडते आणि अचानक आपण एकटेपण अनुभवतो.   इतर लोक बाहेर पार्टी करत असतील  ह्या असूयेपोटी हातातील पक्वान्न जर कडू लागत असेल तर जबरदस्त आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे . मग फोमो ला टक्कर देणारा मानस शास्त्रीय दृष्टिकोन आत्मसात करावा . तो म्हणजे  “” जोमो “” ( जॉय ऑफ मिसिंग आऊट ) मी माझ्या माणसात आत्ता ह्या क्षणी मजेत आहे , आभासी दुनियेतील लोक काय करत आहेत , ह्याच्याशी मला देणे घेणे नाही , मी मजा करतोय , असे स्वतःला ठणकावून सांगणे , म्हणजेच जोमो .

प्रत्येक  ‘ विकएंड ‘ ला बाहेर जाऊन , हजारो रुपये मॉल मध्ये , पब मध्ये उधळून आनंद विकत घेऊन लोक त्याचे फोटो फेसबुक , इन्स्टाग्रामवर टाकतात . त्या चार लोकांकडे पाहून इतर हजारोंना एकाकीपणाची भावना येण्याची काहीच गरज नसते . अशावेळी त्यांनी स्वतःला सांगावे ….सुटीत घरच्यांबरोबर  घालवलेली प्रसन्न सकाळ त्या पब पेक्षा कितीतरी सुकदायक आहे . जीवघेण्या वाहतुकीत जाऊन उद्विग्न होण्या पेक्षा घरी पाय पसरून मुलांबरोबर कॅरम खेळीन !! म्हणावे , ” जोमो !! ”

एकटेपणा कुणी मागून घेत नाही . पण तो वाट्याला आल्यास त्या    एकटेपणाशी झगडून तो नष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात . कुणीतरी हात देईल आणि ह्या गाळातून आपल्याला बाहेर काढले ह्या भ्रमात न रहाता सातत्याने प्रयत्न करावे लागतात . हे स्वतःशी युद्ध केल्यासारखे आहे . पण हार न मानता सतत ह्या काळ्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आपला आपल्यालाच शोधावा लागतो . पुस्तक मैत्री वाढवावी , हृदयाशी संवाद साधावा , नाती जपावीत , कधी आढयता सोडून नम्र होऊन बघावे ….

एकांत असो किंवा एकटेपणा , यातील कुठलीच अवस्था मानवाला दिर्धकाळ नकोय . ह्यातच त्याच्या सुदृढ आणि संतुलित आनंदी आयुष्याचे गमक आहे .

Image by Daniel Reche from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

16 thoughts on “एकांत आणि एकटेपणा 

  • July 7, 2020 at 9:07 am
    Permalink

    Good thoughts. Well explained. Few examples are making the expression of thought clear. In some patches, it has become boaring, which can b avoided. If points are reduced, they will become impactful. Try writing such topics as series of small stories or events to bring out points. It will increase impact.
    Over all well written.

    Reply
    • July 8, 2020 at 6:32 am
      Permalink

      Thank you so much for your valuable
      Suggestions .
      Thanks for reading it with patience .

      Reply
  • July 7, 2020 at 9:42 am
    Permalink

    किती सुंदर लिहिलंत.👌👌❤️
    खूप आवडला लेख.
    लादलेला एकटेपणा आणि हवाहवासा एकटेपणा यातसुद्धा केवढा मोठा फरक आहे. ज्या लोकांना कधी एकटं राहायचं माहीतच नसतं त्यांना एकांतातली मजा कळत नाही, ते दुसऱ्या व्यक्तीला फार लवकर जज करतात, असं मला वाटतं.
    मला स्वतःला एकांत फार प्रिय आहे पण याचा अर्थ मी माणसात रमत नाही असाही नाही.

    Reply
    • July 7, 2020 at 3:33 pm
      Permalink

      खूप धन्यवाद

      Reply
    • July 8, 2020 at 6:29 am
      Permalink

      आपल्याला दोन्हींमधील बॅलन्स हवं असतं .
      कधी एकांत हवा असतो . बाकी आपण सतत आपल्याच माणसांसोबत असतोच …
      थँक्स गौरी

      Reply
  • July 14, 2020 at 2:05 am
    Permalink

    Surekh lekh lihila ahe….examples mule interesting zala ahe

    Reply
    • July 14, 2020 at 4:16 am
      Permalink

      आजही लेख आवडीने वाचल्या जातात ही समाफ़हाणाची बाब आहे …धन्यवाद 👍👍

      Reply
    • July 14, 2020 at 4:17 am
      Permalink

      आजही लेख आवडीने वाचल्या जातात ही समाधानाची बाब आहे …धन्यवाद 👍👍

      Reply
  • July 14, 2020 at 5:30 pm
    Permalink

    Khup chan….👌👌👌
    Sagalyani ch vachayla hava asa aahe

    Reply
    • July 14, 2020 at 6:20 pm
      Permalink

      धन्यवाद

      Reply
      • July 15, 2020 at 3:31 am
        Permalink

        अतिशय वाचनीय लेख . इतका मोठा असूनही वाचत रहावं वाटलं ह्यातच त्याचं यश आहे .

        Reply
  • July 18, 2020 at 5:31 pm
    Permalink

    हवाहवासा वाटणारा एकांतवास आणि एकटेपणा यातील फरक खूप छान लिहिला अप्रतिम फार आवडलं

    Reply
    • July 19, 2020 at 6:17 am
      Permalink

      थँक्स डिअर

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!