देवा घरचे देणे
कधी कधी परमेश्वर अशा काही गोष्टी घडवतो अन त्यात आपल्याला का अडकवतो हेच समजत नाही. बरं त्या गोष्टींमधे आपला काही डायरेक्ट सहभाग असतोच असे नाही. पण ते सारं घडतं तेव्हा आपल्या आजूबाजूला घडतं. जेव्हा एखादी चांगली घटना घडली तर मन प्रफुल्लित होते. उलट जर काही वाईट घडले तर मन खट्टू होते. बरं त्या वाईट गोष्टी ना आपण केलेल्या असतात ना त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यात काही मोठा फरक पडणार असतो. पण मग परमेश्वर जन्माबरोबरच मन आणि भावना देतो.
आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही तरी घेऊन येते. आपल्याला आनंद, प्रेम, दुःख, तिटकारा काहीतरी देतेच. कधी कधी या गोष्टी डायरेक्ट आपल्याशी जोडल्या जातात. तर कधी आपण फक्त काही गोष्टींचे साक्षीदार होतो. कधी काही घटनांनी हसतो, खुश होतो, आनंदी होतो, तर कधी कधी नकळत डोळे पाणावतात, रडू येते, दुःख होते. अशावेळी आपण काहीच करु शकत नसल्याची भावना मात्र मनाला खुप त्रासदायक असते.
आमच्या गावी आमचा एक लहानपणीचा मित्र होता. आम्ही सगळे त्याला राजा म्हणत असू. त्याचे संपूर्ण नाव मात्र राजेंद्रकुमार प्रदीपराव तायडे असे होते. शाळेत हे असे एवढे मोठे नाव त्याने सांगितले की वर्गात खसखस ठरलेली असे. तो माझ्याच आळीत ८-१० घरं सोडून रहायचा.
राजाचे वडील शेती करत असत. अगदी मऊ स्वभावाचा माळकरी माणूस. आपण भलं आणि आपलं काम भलं या स्वभावाचा. त्यांना भजना-किर्तनाला जायची भलती हौस. कित्येक अभंग तोंडपाठ होते त्यांचे. तबला किंवा पेटी वाजवता येत नसली तरी टाळ खुप छान लयीत वाजवत. अर्थात हे सगळे संस्कार राजावर अगदी लहानपणीच झाले. राजाचा आवाज देखील गोड होता. घरातूनच शिकल्याने अनेक अभंग तो आपल्या गोड आवाजात म्हणत असे. शाळेच्या विविध गुणदर्शनाच्या वेळी राजाची कित्येक गोड गाणी वन्स मोअर घेऊन जाण असत.
कोणत्या गावचं पाणी किती दिवस चाखायचं याचे काही संकेत असावेत. आमच्या वडीलांची गावातील बॅंकेतून जिल्ह्य़ाच्या गावच्या शाखेत बदली झाली आणि आमचा गावाचा संपर्क तुटला. तुटला म्हणजे अगदी पूर्ण तुटला असे नाही पण कधीतरी सुट्टीत वगैरे आम्ही घरी जात असू. तेव्हा गावातील बित्तमबातमी मिळत असे.
शाळा संपली, अन मनात मखमली फुलपाखरांचे असे कॉलेजचे दीवस आले. आता इकडचा मित्र परिवार मोठा झाला होता. त्यात आता कॉलेजच्या नवनवीन मित्र मैत्रिणींची भर पडत होती. आता गावाकडे चक्कर कधीमधीच होत होती. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो. गावाकडे काहीतरी महत्त्वाचे काम होते म्हणून पुण्यातून बस पकडली. खरेतर साताऱ्यात जावून मग तिथून गावाकडे जायचा विचार होता पण गावाकडे जाणारी डायरेक्ट लालपरी मिळाली म्हणून मग त्यातच चढलो.
लालपरी असून गाडी एकदम स्वच्छ. सगळ्या सीटची कुशन्स व्यवस्थित. मन सुखावले. गाडी निघाली अन मी खिडकीतून बाहेर पाहत बसलो. थंड वार्याच्या झुळकेने कधी डोळा लागला कळलेच नाही. गाडी आता बरेच पुढे आली होती आणि मला जाग आली ती कंडक्टरच्या त्या तीकीट पंच करण्याच्या टीक टीक आवाजाने आणि त्याच्या माऊली तिकीट बोला या आवाजाने.
मी पाहिले तर तरुण कंडक्टर प्रसन्न हसत माझ्याकडे पाहत होता. पाच फूट उंच, सावळा वर्ण, उभट चेहरा, पाणीदार काळेभोर डोळे, सरळ नाक, कपाळावर गंधाचा आणि बुक्क्याचा टीळा, गालावर भरगोस अशी महाराजांसारखी दाढी, गळ्यातून डोकावणारी तुळशीची माळ आणि प्रेमळ आणि सुखद असा आवाज. या आवाजात त्यांनी मला तिकीट विचारले मी लास्ट स्टॉप सांगितले. त्यानी तीकीट आणि सुट्टे पैसे दिले अन पुढे गेला.
मला का कोणास ठाउक पण याला कुठेतरी पाहिल्या सारखे वाटले. पण डोळ्यात अजून झोप होती. पुन्हा झोपी गेलो. परत जाग आली ती गाडी हायवेवर चहा नाष्ट्याला थांबली तेव्हा. मी नाष्टा करुन चहा घेत होतो तेव्हा कंडक्टरने आवाज दिला. बस निघणार होती. घाईघाईत चहा संपवला. अन पळालो. गाडीत चढलो आणि पाहिले तर कंडक्टरच्या शेजारी जागा रिकामी होती. मी बसलो आणि त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. माझा अंदाज खरा ठरला त्याला पाहिल्यासारखे वाटत होते कारण तो माझा बालपणीचा मित्र राजाच होता.
मला आणि त्याला एवढा आनंद झाला की काय काय बोलू असे दोघांनाही झाले. राजा अगदी तसाच होता. त्याची गाण्याची आवड जोपासली होती. गाडीमधे सुद्धा त्याने स्वतःच्या खर्चाने टेप लावून घेतला होता. वेळेनुरुप अगदी योग्य गाणी बसमधे वाजवली जात. राजाकडून गावातल्या बर्याच गोष्टी माहीत झाल्या. शिक्षणात जास्त प्रगती नाही. पण बिकॉम फर्स्ट इयरलाच कंडक्टरच्या कॉल मधे सिलेक्शन कसे झाले. इंटरव्ह्यू मधे काय काय प्रश्न होते त्याची काय आणि कशी उत्तरे दिली. हे सगळं तो आनंदाने सांगत होता. राजाची गाडी आता मार्गी लागली हे पाहून मला आनंदच झाला. गप्पांच्या ओघात कधी गावी पोहचलो कळलेच नाही. राजाचा निरोप घेतला आणि घरी गेलो.
गावी असताना राजाच्या घरी देखील जाऊन आलो. राजाच्या आईने जेवणाचा आग्रह केला. अगदी साधं पण एकदम चविष्ट गरमागरम जेवण जेवून मी तृप्त झालो. साधेच पण प्रेमाने वाढलेले जेवण कीती चविष्ट असु शकते हे त्या दिवशी मी अनुभवले. गावातले काम झाले अन पुन्हा पुणे गाठले.
माणसाचे एक बरे असते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर आधीच्या गोष्टी जशा दृष्टीआड होतात तशाच त्या ठिकाणच्या आठवणींच्या फाईल सुद्धा बॅकअप स्पेसला जावून पडतात. कधीकधी आठवणीने त्या फाईल वरती येतात. मन भुतकाळात रमते. कधी हसते. कधी रडते. या अनेक आठवणींचा खजीना अनमोल असतो. काळाच्या ओघात तो खजीना रोज उघडला जातोच असे नाही. पण एकदा उघडला की मग मन परत लवकर वास्तवात येत नाही. फक्त ज्यांच्या आठवणीचा खजीना काट्याकुट्यांनी आणि जखमांनी भरलेला असतो त्यांनी मात्र हा खजीना न उघडलेलाच बरे. कारण काळाच्या मलमाने बर्या झालेल्या जखमा पुन्हा पुन्हा खरवडल्या तर त्या जखमा लवकर भरतही नाहीत आणि त्यांचे व्रणही त्या त्रासदायक भुतकाळाच्या आठवणी करुन देत राहतात.
काहीजणच मात्र या जखमांना आणि व्रणांना न विसरता आपण कोठून आलो हे कायम लक्षात ठेवतात आणि आयुष्यात यशाची कितीही उंच शिखरे गाठली तरी आपले पाय जमीनीवर ठेवणारा भुतकाळ आठवणींचा खजीना म्हणून जपतात. हा संघर्ष, ही भावना व्यक्तीसापेक्ष आहे आणि प्रत्येकाच्या भुतकाळानुरुप आहे.
आम्ही कॉलेज संपवून आता आम्ही नोकरीच्या शोधात निघालो. नोकरी मिळालीही. आता एका नव्या आयुष्यात प्रवेश केला. कॉर्पोरेट क्षेत्र, स्पर्धा, टेंशन ह्या गोष्टी नव्याने अॅड झाल्या आणि तो बॅकअप स्पेसचा फोल्डर उघडायला वेळ मिळेनासा झाला.
नोकरीमध्ये बर्याच ठिकाणी फिरती झाली. गावाकडे जावून आता तीन वर्षे झाली होती. तसेच काही कारणही मिळत नव्हते आणि सवडही होत नव्हती. पण मध्यंतरी चुलतभावाच्या लग्नाच्या निमित्ताने गावी जायला मिळाले. दोन दिवस लग्न समारंभ आणि इतर विधीमधे आनंदात गेले. पुजेच्या दुसर्या दिवशी निवांत होतो. इतर भावंडं आणि तिथले काही मित्र आम्ही गप्पा मारत बसलो होतो.
बोलता बोलता मी राजा दिसला नाही म्हणून विचारले तर सगळे गप्प झाले. काय झाले विचारले तर एक मित्र म्हणाला
मित्र – अरे राजा दोन महिन्यांपूर्वी गेला.
मी – कुठे गेला? बदली झाली का? मागे मला एकदा पुण्याहून येताना बसमधे भेटला होता.
मित्र – अरे गेला म्हणजे गेला
त्याने बोट वरती दाखवले.
मी – अरे कसे काय?
मित्र – अरे अॅक्सीडेंट. बस पंक्चर झाली म्हणून ड्रायव्हरला मदत करत होता. एक टेंपो त्या दोघांनाही उडवून गेला.
मी – अरे बापरे… कधी झाले हे.
मित्र – आता दोन महिने झाले.
मला ऐकुन कसंतरीच वाटले. मला डोळ्यासमोर त्याचे आई वडील दिसत होते. दुसर्या दिवशी सकाळी मी अगदी मनाचा हिय्या करून त्यांना भेटायला गेलो. घराचं चैतन्य हरवल्याची पुरती जाणीव होत होती. राजाचे वडील कुठेतरी शुन्यात पाहत बसले होते. त्याच्या आईने पाण्याचा तांब्या आणुन ठेवला. काय बोलावं ते सुचत नव्हते.
मी – मला कालच कळलं. खरःच वाईट झालं. पण कसं झालं?
राजाच्या आईचा बांध फुटला. त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांनी गमावला होता. त्यांची कशी आणि कुठल्या शब्दात समजूत काढावी हेच कळत नव्हते. मी वेळ जावू दिला. त्या शांत झाल्यावर त्यांनी कसं आणि काय झालं ते सांगितले.
– ड्रायव्हरसाइडचं चाक पंक्चर झालं. ड्रायव्हर सुद्धा आपले सदाभाऊ. राजाची आणि त्यांची पुण्याच्या वारीला जोडी होती. त्या दिवशी नेहमीप्रमाणे सगळे चेक करुन बाहेर पडले पण चाक पंक्चर झालं. सर्वांना कायम मदत करायची सवय असणारा राजा. गप्प कसा बसून राहिल. सदाभाऊ आणि तो पंक्चर झालेलं चाक काढत होते. प्रवासी सगळे एका टोकाला उभे. कोण कुठला टेंपो आला काय आणि या दोघांना उडवून गेला काय.
कुणी कुणी पुढे आलं नाही रे. रस्त्यावर तडफडून जीव सोडला माझ्या लेकराने. माणसांनी फोटो काढले पण त्याऐवजी दवाखान्यात नेण्यासाठी धावपळ केली असती तर आज माझा राजा जिवंत असता. काय उपयोग आहे या चांगल्या वागण्याचा? काय मिळाले त्या परमेश्वरावर भक्ती ठेवून?
आयुष्यभर त्याच्या हा बाप कधी मोठ्या आवाजात कोणाला बोलला नाही. भांडण नाही की तंटा नाही आणि अगदी बापासारखाच शांत, सज्जन असा माझा मुलगा. का हिरावून घेतला देवाने?
त्यांच्या त्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नव्हती. त्यांचा आक्रोश पाहणे आणि थांबवणे मला शक्य नव्हते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शेवटी त्याची आईच म्हणाली
-असु दे लेकरा. आठवण ठेवून भेटायला आलास बरं वाटलं. आमचंच काही तरी चुकलं असेल बघ म्हणून ही शिक्षा मिळाली.
मला काय बोलू समजेना म्हणून हात जोडून उठलो. कधी काळी राजानेच ऐकवलेलं “जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला” हे पद आठवलं अन मला त्या परमेश्वराला ओरडून जाब विचारावा वाटला
का तुला तेच लोक आवडतात जे इतरांना आवडतात. अन जर तुला आवडत असतात तर मग त्यांना इथे आमच्यात पाठवतोसच का? तुझ्याकडेच ठेवून घ्यायचे ना? चांगल्या माणसांच्या सहवासाची सवय लावायची आणि मग त्यांना हिरावून घ्यायचे. या म्हातार्या आई बापानी आता जगायचे तरी कसे? कोणासाठी? काय आनंद मिळतो तुला परमेश्वरा असे वागून?
मनातले हे विचार बोलून किंवा ओरडून दाखवू शकलो नाही. त्याने त्या दोघांना आणखीनच त्रास झाला असता. म्हणून मी निघायला वळलो. जगामधे पाठवून दिलेल्या राजा सारख्या चांगल्या माणसांचे काही तरी देणे बाकी असल्यासारखे त्याना अचानक बोलावून घेणार्या त्या परमेश्वराचा मला प्रचंड राग आला होता.
राजाच्या घरातून बाहेर पडताना पाहिले फोटोतून राजा मात्र तसाच नेहमीप्रमाणेच हसत होता.
– अभिजीत इनामदार
सिंहगड रस्ता, पुणे
Image by Free-Photos from Pixabay
Latest posts by Abhijit Inamdar (see all)
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021